जालना : (प्रतिनिधी ) जालना जिल्ह्यातील कडवांची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ ते ७ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

मृत महिला या समृद्धी महामार्गाच्या कामावरून घरी परतत होत्या. कडवांची परिसरात समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. काम संपवून घरी जाणाऱ्या महिलांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की ६ ते ७ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
